कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

कादंबरीकार किरण नगरकर यांचे निधन

मुंबई (लोकमराठी ) : कादंबरीकार किरण नगरकर यांचे आज (ता. ५) निधन झाले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षाचे होते. किरण नगरकर हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक होते.

किरण नगरकरांची पहिली कादंबरी अभिरुची नावाने १९६७-६८च्या सुमारास प्रसिद्ध झाली होती. नंतर तीच ‘सात सक्कं त्रेचाळीस ‘ या नावाने मौज प्रकाशनाने १९७४ला प्रकाशित केली. मराठीतील महत्त्वाच्या कादंबर्‍यांमध्ये हिची गणना होते.

मोजक्याच कादंबर्‍या लिहून नगरकर अत्यंत लोकप्रिय असे कांदबरीकार म्हणून ओळखले जायचे. ‘रावण आणि एडी ही त्यांची कादंबरी इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध झाली. नगरकरांच्या ‘गॉड्स लिटल सोल्जर, ककल्ड या पुस्तकांनी मराठी आणि इंग्रजीत नवे विचार मांडले. २००१ला ककल्ड या पुस्तकासाठी नगरकरांना साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

‘कबीराचे काय करायचे?’ आणि ‘बेडटाईम स्टोरी अशी आणखी काही त्यांची पुस्तके चांगलीच गाजली. स्प्लिट वाईड ओपन’ ह्या चित्रपटातून त्यांनी अभिनयही केला होता. अस्तित्ववादी साहित्याचा बिनीचा शिलेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.