पुण्य करताना पाप होतंय – महापाप

पुण्य करताना पाप होतंय - महापाप

अक्षय काटकर

काही घाटातील हा किळसवाणा प्रकार, येणारा जाणारा प्रवासी वर्ग माकडांना खायला देत आहे. माकडांना खाऊ घालू नका. कारण, हे निसर्ग नियमाविरुद्ध आहे, खाद्य शोधण्याची क्षमता माकडांमध्ये आहे, ती नष्ट करून त्यांना असहाय बनवू नका. वन्यजीवांना खाऊ घालणे बेकायदा आहे. पुण्य करताना पाप होतंय-महापाप.

प्राण्यांना किंवा पक्षांना (कबुतरांना, माकडांना, पोपटांना वगैरे वगैरे) अन्न धान्य खाऊ घालणाऱ्यांच्या बातम्या पाहून आपल्यातला भाबडेपणा जागा होतो. आणि कौतुक करतो आपण.

प्रथमदर्शनी आपण स्वतःवरच खुश होतो की आपल्या मनात किती पवित्र आणि सहानुभूतीचे विचार आहेत. थोडी उसंत घ्या, आधी पुढचे शेवटपर्यंत वाचा.

निसर्ग, या सर्व जीवांना आपल्या जन्मापूर्वीपासून पोसतोय; त्यासाठी त्यांच्या आहार विहार आणि प्रयत्नवादाचे प्रोग्रामिंग त्यांच्या मेंदूत by default निसर्गाने टाकले आहे. वन्य जीवांना आपण आपल्या आवडीचे सोयीचे पदार्थ, आयते भरवून त्यांच्या मेंदूतले सेटिंग नष्ट करतोय. त्यांच्या पुढील पिढ्यांना ऐतं आणि अनैसर्गिक खाण्याची (ज्याने त्यांना, खाल्ल्यावर वेदना होतात बऱ्याचदा-हे सिद्ध झालंय) सवय लावतोय.

ते त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता गमावतात कालांतराने. त्यांची पिल्लेही अक्षम जन्मतात. खंडाळा घाटातल्या माकडांना आयत्या वेफर कुरकुरेच्या सवयी आपण लावल्या;

त्यामुळे त्यांची वजने वाढली, झाडांवरून उड्या मारताना बॅलन्स न झेपल्याने अपंगत्व आले. हाल होत तळमळत मेले. त्यांच्या पिल्लांना मानवाच्या मदतीशिवाय रानावनातून अन्न मिळवण्याची कला मिळालीच नाही. परिणामी रस्त्यावरचे भिकारी होण्या पलीकडे भवितव्य उरले नाही.

outdated पुंण्याच्या कल्पनांनी स्वतःला सुखवण्यासाठी; आणि मुलांना मजा दाखवण्यासाठी या वन्यजीवांच्या, नैसर्गिक जीवनचक्रात ढवळाढवळ करण्याचे, खूप वाईट दूरगामी परिणाम त्यांच्यावर होतात. आणि हे पाप आपल्या हातून होते.

आपल्याला वाटते की आपण किती चांगले काम करतोय, पण आपण त्या जीवांना एकप्रकारे अपंग (adict) बनवतो. आपल्या मुलांना कोणी फ्री मघे 2 पेग दिले किंवा रोज कोणी 500 नोट बक्षीस दिली तर काही दिवसात मुले बिघडतील आणि त्यात त्यांचा दोष नसेल. असेच झालेय बऱ्याच ठिकाणी. मग हे वन्यजीव सवयीमुळे आक्रमक, कधी हल्लेखोरही होतात, आयत्या चमचमीत अन्नासाठी.

अष्टविनायकातल्या लेण्याद्री गणपतीच्या डोंगरावर गेलो होतो. विपुल वनसंपदा अजूनही आहे तिथे. तिथली माकडे छान नॉर्मल जगू शकली असती. पण मानवाने हस्तक्षेप करून त्यांच्या सवयी बिघडवल्या. आता ती माकडे धाक दाखवून हातातल्या पिशव्या राजरोस लुटतात. फोफशी पण झाली आहेत, हे पाप कोणाचे?

परदेशात वन्यजीवांना खाऊ घालण्यावर बंदी आहे. त्यामुळे तिथल्या वन्यजीवांच्या नैसर्गिक आहारात आणि जीवन पद्धतीत बदल होत नाही. पुढील पिढी निकोप निपजते. आपल्या कबुतरांना आता घरटेही बांधता येत नाही कारण अनेक पिढ्यांना आपण आयते दाणे टाकले. कबुतरे इतकी वाढली की त्यांनी चिमण्यांची आणि इतर पक्षांची जागा व्यापली म्हणजे इतर पक्षांवर अन्याय.

काबूतरांमुळे अस्थमा ब्रॉंकायटीस होतो हल्ली लोकांना. कबुतरखान्या जवळच्या लोकांशी बोला, आपल्या बेगडी पक्षी प्रेमापायी त्यांच्या लेकराबाळांना आपल्यामुळे मोठे आजार झाले आहेत.

दुधासाठी पाळल्या जाणाऱ्या गायीला तिच्या मालकाने आहार देणे अपेक्षित आहे. मानवी आहाराने गायींना पोटाचे त्रास होतात, पोट फुगते, अपचन होते हे सिद्ध झाले आहे. या सर्व जीवांना नैसर्गिकपणे जगता येईल, अशी नैसर्गिक वनसंपदा जपुया. देशी झाडांनी ती वाढवूया. जुन्याकाळातल्या पुण्याच्या संकल्पना तपासून योग्य तीथे विधायक बदल करूयात. संतांनी हेच सांगितलंय!

कबुतरांना दाणे टाकणे थांबवूया, स्ट्रीट dogs ना काही पर्याय नसल्याने त्यांचे निरबीजिकरण करून घेणे गरजेचे. कारण, पोटभर अन्न मिळाले की पुढंची गरज ही पुनरुत्पादन ही असते. अनेक अनाथ पिल्ले रस्त्यावर मग निराधार भटकताना दिसतात, त्या वेदना जास्त दुःखदायक. अन्ना इतकेच त्यांचे निरबीजिकरण त्यांच्या बाबतीत महत्वाचे!

तडकाफडकी प्रत्युत्तर देण्याची घाई करू नका, मीही तुमच्या इतकाच प्राणिप्रेमी आहे. पक्षी प्राण्यांना मानवी आहाराची किंवा दानाची गरज नाही. त्यांचा अधिवास (झाडे, जंगले) राखुया. सखोल अभ्यासातून निघालेले निष्कर्ष समजावून घेतलेत तर आपल्या आवडत्या प्राणी-पक्षांसाठी ते खूप फायद्याचे आहे. सदरहू विषयातील तज्ज्ञांच्या अभ्यासावर मते मांडली आहेत.