3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन – जगदीश काबरे

3 जानेवारी: सावित्रीबाई फुले जन्मदिन - जगदीश काबरे

सावित्रीबाई फुलेंनी स्त्रीयांना दाखवलेला शिक्षणाचा मार्ग आणि स्वातंत्र्याचा कानमंत्र यामुळे त्यांचं जगणं बदलेल, शिक्षणामुळे त्या विचार करू लागतील, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला लागतील,एवढंच नाहीतर या समाजात त्यांना पुरूषांच्या बरोबरीनं स्थान मिळेल अशी स्वप्ने गेली काही वर्षे आपण पहात आहोत. पण… तरीही वर्तमानपत्रांतून रोज तिच्यावरच्या वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येताहेत. यावरून हेच सिध्द होतं की, अजुनही स्त्रीला केवळ मादी समजणाऱ्या समाजाची मानसिकता बदललेली नाही. पुरूषाची मानसिकता ज्या प्रमाणात शिक्षणामुळे बदलायला हवी होती त्या प्रमाणात बदलली नाही, हे सत्य आहेच, पण स्त्रीची मानसिकता तरी कुठे बदलली आहे? स्वातंत्र्याचा खरा अर्थ तिला कळला आहे का? परंपरा आणि संस्कृतीचा नेमका काय अर्थ लावताहेत त्या?

आज कार्पोरेट क्षेत्रात लिलया वावरणारी स्त्री जेव्हा मार्गशीर्षातले गुरुवार भक्तीभावाने करते, आपल्या जगण्यातून खास वेळ काढून हळदीकुंकू करते वा विज्ञान शिकवणारी शिक्षिका ‘नेमकी पाळी आल्यानं या वेळचा गुरुवार करता आला नाही’ अशी तक्रार करते, महाविद्यालयीन प्राध्यापिका आठवड्याचे रंग व ग्रहाप्रमाणे ठरवून त्या त्या वारी त्या विशिष्ट रंगाचे कपडे घालून येतात, तेव्हा आपण कोणत्या काळात आहोत हेच कळत नाही.

…तर नवश्रिमंत वर्गातील मुली या फॅशन, मुक्तपणे फिरण्याची मुभा व पार्टीज करायला मिळणं म्हणजेच स्वतंत्र होणं असं समजायला लागल्या आहेत. आणि मध्यमवर्गातील मुली या सगळीकडे जाण्याचा प्रयत्न करताहेत. परंतू त्यांच्या आईवडीलांनी जे तथाकथित परंपरेचे स्वरूप त्यांना सांगितलं आहे त्यात अडकून द्विधा मनस्थितीत सापडल्या आहेत. म्हणजे हॉट पँट घालून बीचवर जायचं आणि नऊवारी नेसून, नथ वगैरे घालून मंगळागौर आणि सत्यनारायण करत आपण आधुनिकता आणि परंपरा दोन्हीची छान सांगड घालू शकतो, असा आभास निर्माण करून आत्मानंदात मश्गुल व्हायचं, असं काहीसं झालं आहे.

आजच्या स्रियांना स्वत:ची अशी ओळख आहे का? स्वत:ची अस्मिता, स्वत:चा स्वाभिमान आहे का? मी नेहमी स्रियांना एक प्रश्न विचारत असतो की, तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाई फुलेंच्या शिक्षणाचा तुम्ही उपयोग काय केला? तुम्हाला सावित्रीबाईनी शिक्षण दिलं त्यासाठी अंगावर दगड माती झेलून, त्या शिक्षणाचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त नवर्याची सेवा करायला, संत्संगला जायला, पोथीपुराणे वाचता यावीत, उपासतापास करता यावेत, वैभवलक्ष्मीची पारायणे करता यावीत याच्यासाठी सावित्रीबाईनी तुमच्यासाठी शिक्षणाची दारे उघडली का? याच्यासाठी सावित्रीबाईंनी का दगड-माती आणि शेणगोळे खाल्ले!याच्यासाठी सावित्रीबाईंनी वाटेल तसा मान-अपमान सहन केला!! कशासाठी केला त्यांनी हा उपद्व्याप? तुम्ही चांगल्या साड्या नेसाव्यात म्हणून? तुम्हाला पार्लरला जाऊन स्वत:ला नटता यावे म्हणून? ह्या शिक्षित स्रियांनी नवीन काय केलं? दोनशे वर्षापुर्वीही स्री हे सर्व न शिकता, आपल्या, मुलाबाळांना, पतीला, सासू-सासऱ्याला न्याय देत होती की. न शिकताच सर्व करीत होती तर मग तुम्ही नवीन काय केलं?
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे जरी गेल्या काही वर्षात स्त्री शिकू लागली. शिक्षण, अर्थार्जन असे टप्पे घेत तिने चक्क अंतराळात झेप घेतली. सारे कसे तिच्या मनासारखे झाले. पण तिचे जळणे, सोसणे आणि तोंड दाबून बुक्क्याचा मार थंबला का? वर्तमानपत्रातील बलात्काराच्या बातम्या, हुंडाबळी आणि मारहाणीच्या बातम्या ओरडून, किंचाळून सांगताहेत की, स्त्रीचे जळणे अद्याप सुरू आहे. विद्याविभूषित आणि भरमसाठ पगार घेणारी स्त्रीसुध्दा कधीकधी सासुरवासाच्या नरकात अशी पिळवटली जाते की, मानहानी सहन न होऊन आत्महत्येचे पाऊल उचलते. स्वत:ला आधुनिक समजणार्या प्रथितयश अभिनेत्रीनासुध्दा स्त्रीदेहाचे प्रदर्शन आणि कधीकधी शोषण करू दिल्याशिवाय पर्याय उरत नाही. हे सारे पाहिले की वाटते, आजही स्त्रीचे सती जाणे सुरूच आहे. फक्त त्याचे स्वरूप, संदर्भ व परिस्थिती बदलली आहे. स्त्री खरेच मुक्त झाली आहे का?

आम्हाला वाटतं, आजच्या आधुनिक होणाऱ्या मुलींनी परंपरांचे अर्थ समजून घेण्याची गरज आहे. आता त्यांनी या कर्मकांडातून बाहेर यायला हवं, व्रतवैकल्याच्या जंजाळातून स्वत:ला सोडवायला हवं. बाईला येणारी पाळी हा निसर्गधर्म आहे व त्याचा शुध्द-अशुध्दतेशी तसेच शुभ-अशुभाशी काही संबंध नाही, हे समजून घ्यायला हवं. बलात्कार करणारा दोषी असतो, जिच्यावर झाला आहे ती नाही, हे लक्षात घ्यायला हवं. बाईसाठी तयार केलेल्या पावित्र्याच्या आणि योनीशुचितेच्या भ्रामक कल्पनांतून तिनं स्वत:ला सोडवायला हवं.

स्त्रीत्वाचा खरा अर्थ जाणून घेतला तर कदाचित स्त्रीया स्वत:ला सापडूही शकतील. पण जर का त्या समाजाच्या पारंपारीक सोनेरी चौकटीत अडकून पडल्या तर, अधिकाधिक आधुनिक अंधश्रध्दा निर्माण करत रहातील. बायकांना या चौकटीत जखडून ठेवण्याचा डाव फार पूर्वीच स्मृर्तिकारांनी खेळला आहेच. पण आता त्यातून बाहेर पडायची वेळ आली आहे. त्यासाठी आता स्त्रीयांनी खर्‍या अर्थानं बहुश्रुत व्हायला हवं. आणि जर वैज्ञानिक दृष्टीकोन असलेली नवी पिढी घडवायची असेल तर त्यांनी प्रथम स्वत: यातून बाहेर पडायला हवं.

मुळात शिक्षण कशाला म्हणतात? ज्योतिबा फुले म्हणतात, ‘खरे आणि खोटे ओळखण्याची ताकद म्हणजे शिक्षण , सत्य आणि असत्याला वेगळं करून सत्याला छातीठोकपणे स्वीकारण्याची ज्याच्यामध्ये हिम्मत निर्माण करतं ते शिक्षण होय.’ मग आजच्या स्रियांनी नेमकं कोणतं शिक्षण घेतलं? खेदाने असे म्हणावे लागते की, आम्ही सदाशिव पेठेतलं शिक्षण घेतलं. जर आम्ही ज्योती-सावित्रीच्या गंजपेठेतलं शिक्षण घेतलं असतं, तर आम्ही फार चांगल्या प्रकारे सुशिक्षित झालो असतो. स्रिया जोपर्यंत खऱ्या अर्थाने शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत, सृर्जनशील बनत नाहीत, तोपर्यंत स्रियांची ओळख निर्माण होऊ शकणार नाही असे मला वाटते.