स्वतःचा रक्ताने पहिली सही करून एक लाख सह्यांचे निवेदन देणार – विष्णुपंत भुतेकर

प्रतिनिधी / शंकर सदार

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजाराची मदत मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही

रिसोड: – सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने सरसकट हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत द्यावी म्हणून भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सभापती रिसोड कृषी उत्पन्न बाजार समिती विष्णुपंत भुतेकर यांनी रिसोड स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकार व बाजार समितीकडून शेतकरी नेते स्व. शरद जोशी आणि लोकनेते स्व. गोपनाथ मुंढे यांना आदरांजली वाहून त्यांचे फोटो बाजार समितीत लावण्यात आले.

सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनच्या पडलेल्या भावामुळे प्रचंड अडचणीत आलेला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेच्या माध्यमातुन राज्य सरकारने हेक्टरी दहा हजार रुपयाची सरसकट मदत द्यावी याकरिता भूमिपुत्र शेतकरी संघटनेकडून राज्याचे मुख्यमंत्री तथा राज्य सरकारला निवेदन दिलेली आहेत. राज्य सरकारने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे 15 डिसेंबर पासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या एक लाख सह्या घेण्याची मोहीम भूमिपुत्र कडून राबवली जाणार आहे. पहिली सही विष्णुपंत भुतेकर स्वतःच्या रक्ताने करणार असून इतर एक लाख सह्यांचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व राज्य सरकारला दिले जाणार असल्याचे पत्रकार परिषदे समोर विष्णुपंत भुतेकर यांनी सांगितले.

तसेच आकांक्षीत ( मागास) असणाऱ्या वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व कापूस उत्पादक शेतकरी पडलेल्या भावामुळे देशोधडीला लागले आहेत. राज्य सरकारने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत न केल्यास भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे सत्र वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे आर्थिक बजेट सोयाबीन भावामुळे कोलमडले आहे. राज्य सरकारने भावांतर योजनेच्या माध्यमातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे मत विष्णुपंत भुतेकर यांनी यावेळी व्यक्त केले. भविष्यात पीक कर्ज भरण्यापासून तर खरिपाच्या पेरणीच्या सुद्धा अडचणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना येऊ शकतात. त्यामुळे राज्य सरकारने नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा करावी यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटना प्रयत्नशील असून जोपर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत नाही तोपर्यंत विविध पद्धतीने आंदोलन सुरु राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला भूमिपुत्र कृ. बा. चे संचालक रवींद्र चोपडे,भूमिपुत्र तालुका समनव्यक महादेव पातळे यांच्यासह रिसोड शहर व तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्तित होते.