अजब प्रेम! पळून गेलेले व्याही-विहीण परत आले, पण…

अजब प्रेम! पळून गेलेले व्याही-विहीण परत आले, पण...

लोकमराठी : काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये एक घटना घडली होती. एक ठरलेलं लग्न पार पडण्याआधी नवऱ्या मुलीची आई आणि नवऱ्या मुलाचे वडील फरार झाले होते. सूरतमध्ये घडलेल्या या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. पण, आता पळून गेलेले ते दोघे जण परतल्याचं वृत्त आहे.

गुजरातमध्ये सूरत येथील काटरगाम गावात राहणाऱ्या एका तरुणाचा विवाह येत्या फ्रेबुवारीत नवसारीतील एका तरुणीशी होणार होता. लग्नाच्या एक महिना आधीच म्हणजे 10 जानेवारी रोजी या तरुणीची आई बेपत्ता झाली. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. याच दरम्यान नवऱ्या मुलाचे वडीलही बेपत्ता झाले. त्यांच्याही कुटुंबीयांनी पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधायचा प्रयत्न सुरू केला. मात्र, काही दिवसांनी त्या दोन्ही कुटुंबाना ते दोघे एकत्र पळून गेल्याची कुणकूण लागली.

दोन्ही कुटुंबांनी त्यांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळवली. तेव्हा ते दोघंही खूप आधीपासून एकमेकांना ओळखत होते आणि तारुण्यात असताना त्यांना एकमेकांशी लग्न करायचं होतं, असं उघड झालं. व्याही आणि विहिण होऊ पाहणारे दोन जण पळून गेल्याने त्यांच्या मुलांचं होऊ घातलेलं लग्न मोडलं.पण, आता हे दोघंही जसे पळून गेले होते, तसेच वेगवेगळे परत आले आहेत. मात्र, परतल्यानंतर या महिलेला स्वीकारण्यास तिच्या पतीने नकार दिला आहे. त्यामुळे तिने पोलिसात नवऱ्याची तक्रार केली आहे.