अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व | मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन

अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व | मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क

पुणे : राजकारण हे लोकांची सेवा करण्याचे माध्यम आहे. तो वारसा पवार कुटुंबात मुळातच आहे. महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या समाजसुधारकांचा वसा व वारसा रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब जपत आहेत. महाराष्ट्राच्या आणि पार्यायाने देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. अजितदादा पवार हे तो वसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. अजितदादा पवार हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. असे प्रतिपादन माजी खासदार तथा नियोजन आयोगाचे माजी सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हडपसरमधील एस.एम.जोशी कॉलेजात अर्थशास्त्र व राज्यशास्त्र या दोन विभागांच्यावतीने “महाराष्ट्राच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक जडणघडणीत मा. ना. अजितदादा पवार यांचे योगदान” या विषयावर राज्यस्तरीय वेबिनार आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

डॉ. मुणगेकर म्हणाले की, “सर्व सामान्यांचा नेता, दूरदृष्टीचा नेता, सामाजिक बांधिलकी जपणारा नेता, उत्तम प्रशासक, खंबीर नेतृत्व, उत्तम संघटन कौशल्य व प्रचंड मोठी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे सामर्थ्य, परखड व स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर घट्ट पकड, निर्णयक्षमता ही अजितदादांची ख्याती आहे. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. अशी त्यांची धारणा आणि भूमिका असते. त्यांच्याकडे काम घेऊन जाणाऱ्याचे काम झाले पाहिजे असे त्यांना मनापासून वाटते. महाराष्ट्राला समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचे सामर्थ्य अजितदादा पवार यांच्यामध्ये आहे. कोणत्याही कार्यकर्त्यामधील गुण हेरून त्याला न्याय देण्याचे काम ते करतात.”

ते आपल्या भाषणामध्ये पुढे म्हणाले की,”रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यासारख्या संस्थां मोठ्या होण्यामध्ये अजितदादा पवार यांचे योगदान निश्चितच मोठे आहे. या संस्थांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम अजोड आहे. चारित्र्यवान पिढी तयार करण्याचे काम या संस्था करीत आहेत. या कामी मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व अजितदादा पवार यांचे योगदान मोलाचे आहे.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतनदादा तुपे होते. कार्यकर्त्यामधील गुण ओळखून संधी देणारे नेतृत्व म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे पाहिले जाते. महाराष्ट्राच्या या धडाडीच्या नेतृत्वाखाली उद्याचा महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होईल असा मनोदय आमदार तुपे यांनी आपल्या भाषनातून व्यक्त केला.

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव प्राचार्य डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी बीजभाषण केले. आशिया खंडातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला येत असलेल्या रयत शिक्षण संस्थेला दिशा देण्याचे महत्वपूर्ण कार्य शरदचंद्रजी पवारसाहेब आणि अजितदादा पवार करीत आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले यांनी केले. याप्रसंगी त्यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला व सर्व मान्यवरांची ओळख करून दिली. या वेबिनारसाठी महाराष्ट्र राज्यामधून सहाशे संशोधक अभ्यासक सहभागी झाले होते. हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी डॉ. वैशाली पाटील, डॉ. सरोज पांढरबळे, डॉ. विश्वास देशमुख, प्रा. तनुश्री दुसाणे यांनी प्रयत्न केले. वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा. नम्रता मेस्त्री यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मानले.