संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल

  • पत्रकारांना हेतुपुरस्सर गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाईची एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल

जालना : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार असून ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे. त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

एनयुजे महाराष्ट्र नेहमीच सक्षम समाजासाठी व पत्रकारांच्या सन्मानासाठी काम करत राहील असेही करदेकर यांनी सांगितले.

निवेदनात म्हटले आहे की, संपादक गोयल व मानकर हे दि. २८ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळाच्या कार्यालयात जालना येथील वाढत्या प्रदूषणासंदर्भात माहिती घेण्यासाठी गेले असता तेथील अधिकारी योगिनी अविनाश बाळंके यांनी त्यांना वेळ न देता कुठलीच माहिती उपलब्ध करून न देता उलट कार्यलयातील सेक्युरिटी मार्फत एका आठवड्यानंतर येऊन माहिती घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

जालना येथील एमआयडीसीमध्ये वारंवार प्रदुषण वाढत आहे. आणि अनेकदा याबाबत प्रदुषण महामंडळ अधिकार्‍यांचे लक्षात आणून दिले. बातम्या लिहिल्या याचा राग योगिनी अविनाश बाळंके यांचे मनात होताच. उडवाउडवीची उत्तरे देणे, आपले कर्तव्य नीट न बजावणे, पत्रकारांना अपमानकारक वागणूक देणे आणि जे चुकीचं काम करतोय याबाबत जराही अपराधी भावना नसणे अशी मनमानी करण्याच्या त्यांच्या वागणुकीची तक्रार करण्यासाठी अर्पण गोयल आणि भरत मानकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे गेले असता त्यांची लेखी कैफियत निवासी जिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्याकडे मांडण्याचे सांगण्यात आले. त्यांनी पत्रकाराचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांनी दिलेल्या तातडीने प्रदूषण अधिकारी योगिनी अविनाश बाळंके यांना मोबाईलवर कॉल करून पत्रकारांना माहिती देण्याचे सांगितले शिवाय त्या औरंगाबाद येथून अप-डाऊन करीत असल्याने त्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देखील देण्यात आले.

प्रदूषण नियंत्रण अधिकारी योगिनी अविनाश बाळंके यांच्या औद्योगिक वसाहत कार्यक्षेत्रात प्रदूषण वाढले असल्याने याबाबत कुठलीच कारवाईही होत नसल्याने बाळंके यांची लेखी तक्रार दि. २९ जुलै २०२० रोजी प्रदूषण महामंडळ विभागीय कार्यालय औरंगाबाद येथील कार्यालयात करण्यात आली होती. याबाबतची बातमी दैनिक गोकुळनीती आणि दैनिक तात्काळ राज्यवार्ता यांनी छापली होती.

याशिवाय प्रदूषणच्या बाबतीत पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांना देखील तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी या सर्व गोष्टीचा राग मनात धरून प्रदूषण अधिकारी योगिनी अविनाश बाळंके यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्यात हेतुपुरस्सरपणे दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर, प्रदूषण महामंडळाच्या कार्यलयात कधीच पाय न ठेणारे पत्रकार विष्णु कदम यांनी बातमी लिहिली यासाठी आणि विष्णु कदम त्यांचे मित्र नीलकंठ कुलकर्णी जे नेहमी त्यांच्या सोबत राहतात त्यांचे नावाने गुन्हा नोंदवण्यात आला.

चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांनी देखील त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या अट्टल गुन्हेगारांना कधीच पकडले नाही, परंतु पत्रकार गुन्हेगार असल्याप्रमाणे कुठलीही चौकशी न करता गुन्हा नोंदविला.

खरं तर पत्रकार सुरक्षा कायद्याखाली एसीपी दर्जाच्या अधिकार्‍यांनी ही चौकशी करुन, मग गुन्हा दाखल करणे आवश्यक होते. मात्र केवळ ‘आधी माहिती द्या, मग इतर काम करा! ‘ असं म्हटलं तर सरकारी कामात अडथळा निर्माण होतो का? हा मोठा प्रश्न या कार्यतत्पर अधिका-याच्या कार्यशैलीवर निर्माण झाला आहे.

पत्रकारांनी बातमीसाठी माहिती विचारणे हा जर गुन्हा ठरत असेल तर भविष्यात शासकीय कार्यलयात जाण्यापुर्वी पत्रकारांना संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज देऊन पोलिस संरक्षणं आणि सोबत साक्षीदार घेऊन जावे लागेल. असे स्पष्ट मत एनयुजे महाराष्ट्र जालनाचे कोषाध्यक्ष रवि धानम यांनी व्यक्त केले आहे. प्रदूषण महामंडळच्या अधिकारी योगिनी अविनाश बाळंके जालना येथे कार्यरत झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा घेतल्यास सर्व सत्य बाहेर येईल.

मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेऊन, पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा. प्रदूषण नियंत्रण महामंडळच्या अधिकारी योगिनी अविनाश बाळंके व चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कौठाळे यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्याच्या वतीने करण्यात आली आहे.

पत्रकारांवर गुन्हे व अटक केल्यानंतर तरी जालनातील वाढते प्रदुषण नियंत्रणात येईल का? हा सवाल आहेच! हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार आहे! आणि हे आता थांबायला हवेच अशी ही आग्रहाची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाची प्रत गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सदस्य सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पाठवण्यात आली आहे अशी माहिती एनयुजे महाराष्ट्र कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांनी दिली आहे.