नथुराम आणि गांधीजी

नथुराम आणि गांधीजी

कामिल पारखे

पणजी येथे धेम्पे कॉलेजात माझे पदवीचे आणि पदव्युत्तर शिक्षण झाले आणि माझा मुख्य विषय होता तत्त्वज्ञान. त्यात एक वर्षी फिलॉसॉफी ऑफ रिलीजन म्हणजे चक्क ‘विविध धर्मांचे तत्त्वज्ञान” हा एक विषय होता. श्रीरामपूरला दहावीपर्यंत मराठी भाषेत शिकून येसुसंघिय किंवा जेसुईट फादर होण्यासाठी सत्तरच्या दशकात मी गोव्यात आलो होतो. कौटुंबिक पार्श्वभूमी काथोलिक धार्मिक अशी होती नाही तर जीवनभर संन्याशी धर्मगुरु होण्याचा कुणी विचारही केला नसता.

तत्त्वज्ञान हा विषय घेण्याचे एक कारण म्हणजे धर्मगुरु होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तत्वज्ञान आणि ईशज्ञान ( थिऑलोजी ) या विषयांचा अभ्यास करावा लागतोच, नाहीतर फॉर्मेशन टप्प्यालाच गच्छंती होते. धर्मगुरु होण्यासाठी किमान तेव्हढी बौद्धिक पातळी आवश्यक आहे असे जेसुईट संस्था मानते.

तर या कॉलेज जीवनात तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात मी यथेच्छ डुंबलो. याकाळात शिक्षणाचा आनंद मी घेतला तितका आधी कधीही घेतला नव्हता. याचे मुख्य कारण होते मिरामारच्या धेम्पे कॉलेजातले माझे तत्त्वज्ञानाचे शिक्षक जी. एन. मिश्रा, अफांसो सिनियर, आणि मुंबई विद्यापीठातील पणजी पदव्युत्तर केंद्रातील दोन शिक्षक डॉ. शि. स. अंतरकर आणि आफांसो ज्युनियर.

तत्त्वज्ञानाच्या या चारही शिक्षकांनी धर्मगुरु होण्यासाठी गोव्यात आलेल्या मला जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आमची पदवी परीक्षा होण्याआधीच मी धर्मगुरु होण्याविषयीचा माझा निर्णय बदलला आणि तसे आमच्या जेसुईट सुपिरियर धर्मगुरुंना कळवलेसुद्धा.

या टप्प्यात शि. स. अंतरकर सरांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. मुळात कट्टर सनातनी पार्श्वभूमी असलेले अंतरकर मुंज झाल्यापासून शेंडी राखत आणि धोतर नेसत, तसेच संस्कृत श्लोकांचे पठण करत असत नंतर मात्र ते पुर्णतः इहवादी, नास्तिक झाले आणि मला शिकवत असताना ते एम्पिरीसिझम किंवा अनुभववाद यातील एक शाखा असलेल्या लॉजिकल पॉझिटिव्हीझम या विचारसरणीचे कट्टर पुरस्कर्ते होते. या विचारसरणीचे प्रणेते असलेल्या सर ए. जे. एयर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याचे इंग्रजी पुस्तकही त्यांनी मराठीत आणले होते.

तर या अंतरकर सरांशी एकदा संभाषण चालू असताना माझ्या बोलण्यात ‘माथेफिरु’ नथुराम गोडसे ‘ असा शब्दप्रयोग आला.

“माथेफिरु ? नथुराम गोडसेला ‘माथेफिरु ‘ कसं म्हणता येईल?” असा अंतरकरांचा सवाल होता.

“नथुराम गोडसेचं डोकं फिरलं म्हणून त्यानं गांधीची. हत्या केली नव्हती, त्याचं कृत्य हे विचारपूर्वक केलेलं कृत्य होतं. भले तुम्ही त्याच्या विचारांशी तुम्ही सहमत नसताल पण तुम्ही त्याने केलेल्या हिंसक कृत्यामुळे त्याला ‘माथेफिरु’ म्हणू शकत नाही, ” असा त्यांचा युक्तीवाद होता.

“यामागचे कारण म्हणजे आपण काय केले आणि कशासाठी केले हे नथुरामने नंतर सविस्तरपणे सांगितले होते,” असे अंतरकर म्हणाले.

अंतरकर सरांचं ते वक्तव्य ऐकून मी एकदम थक्क झालो. शालेय जीवनापासून नथुराम गोडसे हे नाव कायम ‘ माथेफिरु’ या विशेषणासह वापरले जात होते, बहुधा अगदी पाठ्यपुस्तकांतसुद्धा हाच शब्द असायचा. गुलामगिरी कायद्याने नष्ट करणारे अमेरीकन राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या सुध्दा एका अज्ञात माथेफिरुने केली असेच वर्णन असायचे.

अंतरकर सर स्वतः आपली सनातनी आणि कर्मठ व्यक्तिपासून ते इहलोकवादी असा प्रवास झाल्याचे त्यांच्या क्लासरुम लेक्चर्समध्ये आणि सार्वजनिक कार्यक्रमांत नेहेमी सांगत असत. मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख असलेले मे. पु. रेगे यांना त्यांनी पणजीतल्या आम्हा तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी पाहुणे व्याख्याते म्हणून बोलावले होते. रेगे सरांशी आम्ही संवाद साधला होता. मुंबईतल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये असलेल्या य. दि. फडके यांच्याशीही त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांशी गाठ घडवून आणली होती. विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याची अंतरकरांची नेहेमी धडफड असायची.

पणजीतल्या १८ वा जून रोडवर असलेल्या पदव्युत्तर केंद्राच्या सुशिला बिल्डींगमधला ‘माथेफिरु नथुराम’ बाबतचा तो संवाद तब्बल चार दशकानंतर मला आजही आठवतो.

डॉ. अंतरकरांच्या तात्त्विक निष्ठांबाबत मला कुठलीही शंका नसली तरी नथुरामला ‘माथेफिरु’ म्हणून न संबोधण्याबद्दलच्या त्यांच्या भूमिकेने मला खूप संभ्रमात टाकले.

याच दरम्यान पदव्युत्तर शिक्षण चालू असताना मी पणजीला नवहिंद टाइम्सचा क्राईम आणि कोर्ट रिपोर्टर होतो. बॉम्बे हायकोर्टाच्या पणजी खंडपीठातील कायद्यासंदर्भात बातम्या देताना अनेक कायदेशीर बाबी कळल्या. त्यापैकी एक म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या व्यक्तीला न्यायालय शिक्षा देत नाही तर त्यांची मनोरुग्ण म्हणून एखाद्या पुनर्वसन संस्थेत रवानगी करते. मुंबईत अनेक लोकांची हत्या करणाऱ्या रामन राघवन या खतरनाक माथेफिरु व्यक्तीची याच तत्त्वामुळे फाशी टळली होती. बापुजींचे खुनी असलेल्या नथुराम गोडसेबाबत अंतरकर एका अर्थाने बरोबर होते हे मग मला नंतर कळाले.

फ्रिडम ऑफ विल किंवा स्वतंत्र इच्छाशक्ती यास धर्मात, नितीशास्त्रात आणि न्यायशास्त्रात एक अत्यंत आगळेवेगळे, अनन्यसाधारण महत्त्व आहे. माथेफिरु किंवा वेडसर व्यक्तीला दोषी ठरवण्याबाबतचे अनेक नियम लागू होत नाहीत ते यामुळेच.

हे संभाषण झाल्यावर मी लवकरच गोवा सोडले. कालांतराने अंतरकर मुंबई विद्यापीठात तत्त्वज्ञान विभागप्रमुख बनले आणि हे ‘माथेफिरू नथुराम’ प्रकरण मी विसरलो. माझ्या विस्मृती पटलात हा विषय कधीच ढकलला गेला होता. नव्वदच्या दशकात पुण्यातील एका विधानसभा निवडणुकीत गांधीहत्या आणि नथुराम गोडसे हा विषय एक मुद्दा बनला आणि

एका समाजघटकात नथुराम गोडसे या व्यक्तीविषयी किती आदर आहे याची भयचकित करणारी जाणीव मला तेव्हा झाली.

अंतरकर सरांचा ” माथेफिरु ‘ या शब्दाला असलेला आक्षेप ऐकून मला बसलेला धक्का अगदी मामुली होता, पुण्यात उघडपणे अनेक नथुराम गोडसेवादी आहेत हे लक्षात येऊन मी थक्क झालो होतो. बाहेरच्या बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेत गोडसेवादी असलेल्या मंडळींनी आपापल्या बिळांतून बाहेर येण्याची ही केवळ सुरुवात होती.

हिमानी सावरकर या विनायक दामोदर सावरकर यांच्या धाकट्या भावाच्या सून आणि गांधी खून खटल्यात शिक्षा भोगून परतलेल्या गोपाळ गोडसे यांची त्या कन्या म्हणजे नथुरामच्या पुतणी होत्या. त्यांनी भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यातील कसबा पेठ विधानसभेची निवडणुक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. झाले, त्यानंतर नथुराम गोडसे, ‘गांधीहत्या आणि मी’ हे पुस्तक लिहिणारे नथुरामचे बंधू गोपाळ गोडसे, महात्मा गांधी हत्या खटल्यात अडकलेले सावरकर या सर्वांविषयी पुण्यातील, महाराष्ट्रातील आणि देशातील नियतकालिकांत रकानेच्या रकाने भरुन मजकूर येऊ लागला.

मला वाटते नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण आणि महात्मा गांधी यांना नीच ठरवण्याचा तोपर्यंत अगदीं छुपा असलेला एक अजेंडा अशाप्रकारे त्यावेळी पहिल्यांदाच उघडपणे मांडला गेला. इतकेच नव्हे तर “या विषयाला दुसरीही बाजू आहे तर ती मांडली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्यांना ती मांडू देण्याची संधी दिली पाहिजे’ असे बिनदिक्कतपणे प्रसारमाध्यमांत बोलू जाऊ लागले. त्याबाबत होकारार्थी मान डोलवणाऱ्यांच्या संख्येंत नंतर अगणित वाढ होत गेली हे आपण नंतर सर्वांनी अनुभवलेले आहेच.

प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नव्वदच्या दशकात आणलेल्या नाटकाने त्यावेळी कितीतरी लोकप्रक्षोभ अनुभवला होता. असे नाटक मराठी रंगभूमीवर येऊ शकते, थिएटरमध्ये अशा नाटकाला प्रेक्षकांचा उत्फुर्त, भरभरून प्रतिसाद मिळू शकतो यावर विश्वास ठेवायला खूप जड गेले.

त्यानंतर अभिव्यक्तीच्या नावाखाली या नाटकाला विरोध करणे अनेक लोकांनी आणि संघटनांनी सोडून दिले आणि इथेच बहुधा गफलत झाली असावी. विचारांची लढाई विचारी मार्गानेच लढायची असे अगदी उदारपणाने म्हटले गेले खरे, मात्र या लढाईत तसे य. दि. फडके प्रभुतींप्रमाणे त्यानंतर कुणी आक्रमकपणे उतरलेच नाही.

नथुरामप्रवृत्तीला, संकुचित आणि विघातक विचारसरणीला विरोध करण्याचे तसेच

गांधीवादाचा आणि सर्वसमावेशकतेचा प्रसार करण्याचे काम डाव्या, पुरोगामी आणि गांधीवादी मंडळींनी याकाळात पूर्ण थांबवले. त्यांच्या संस्था-संघटना एकतर नामशेष झाल्या किंवा त्यामध्ये नवीन रक्ताची भर कधी पडलीच नाही. या विचारसरणीच्या सर्व संघटनांना याच काळात उतरती कळा लागली आणि उलटपक्षी या कामाने जोर धरला. उजव्या शक्ती आणि उजव्या विचारसरणीची या काळात शिरसी होत गेली आणि त्यानुसार उजवे पक्ष अधिक ताकदीने सत्तेवर येत राहिले.

त्यामुळे आता थेट महात्मा गांधींना किंवा त्यांच्या प्रतिमेला गोळ्या घालण्याच्या घटनांविषयी ना कुणाला खेद वा खंत वाटतो. भर सभेत आणि पवित्र संसद सभागृहातसुद्धा अशा धक्कादायक घटना घडतात तेव्हा काही जण खाली मान घालून त्या चालू देतात तर इतर जण त्याबद्दल जल्लोष करत असतात. बापूंना शिव्या घालणारे, गरळ ओकणारे रातोरात सेलिब्रिटी

होतात, हे वलय मग त्यांना कित्येक वर्षे खूप लाभ देऊन जाते. साठ- सत्तरच्या दशकांत महाराष्ट्रात याच्या अगदी उलट स्थिती होती! त्याकाळात नव्या दमाच्या, नव्या प्रागतिक विचारांच्या बंडखोर तरुणांनी समाजात अगदी रान उठवले होते. या पिढीतील अनेक जण गेल्या दशकात काळाच्या पडद्याआड झाले, अजूनही आहेत ते प्रभावहीन झाले आहेत.

आधी शिवसेनेचे नेते असलेले, शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या भुमिका करुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांनी अर्थातच आजच्या काळातल्या ‘रायटिंग्स ऑन द वॉल’ पुर्णतः निरखल्या आहेत. त्यांचा अर्थ चांगल्या प्रकारे समजावून घेतला आहे. वारे कुठल्या दिशेने फिरत आहेत याचा बरोबर अंदाज आल्याने त्यानुसार चारपाच वर्षांआधीच त्यांनी नथुराम गोडसे याची बाजू मांडणारी भुमिका करण्याचा निर्णय घेतला हे मान्य करायलाच हवे. नथुराम गोडसेच्या भुमिकेमुळे अभिनेता आणि राजकारणी म्हणून दोन्ही पातळींवर त्यांना यश मिळेल याची त्यांना पुरेपुर खात्री असावी.