उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप

उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

देहू : येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी व्यक्त केली आहे.

जगताप म्हणाले की, श्रीक्षेत्र देहू (Dehu) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे मोठे नेते उपस्थित होते, परंतु पंतप्रधान येणार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रोटोकॉल नुसार, किंवा राजशिष्टाचार म्हणून स्वतः उपस्थित होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी अजित पवार हे विमानतळावरही उपस्थित होते. राजशिष्टाचार म्हणून एका राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी जे करायला पाहिजे होते ते अजित पवारांनी केले. परंतु देहू या ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांची भाषणे झाली परंतु अजित पवार यांना भाषण करण्याची संधी दिली गेली नाही. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना बोलून न देणे, म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही. हे जाणून बुजून केलेलं कृत्य आहे. या पाठीमागे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कूटनीती, वैफल्यग्रस्तता, कपटीपणा आहे, या घटनेचा मी जाहीर निषेध करतो.