आझाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

आझाद : भारतरत्न नाकारणारा अवलिया

कलीम अजीम

भाजपशासित सत्ताकाळात हिंदु-मुस्लिम ऐक्याला सुरुंग लागली असताना राष्ट्रीय एकात्मतेचा पुरस्कार करणारे मौलाना आझाद सहज आठवून जातात. मुसलमानांनी काँग्रेसशी जोडून घेणे हे त्यांचं धार्मिक कर्तव्य आहे, असं सांगणारे आझाद काँग्रेसने मुसलमानांच्या केलेल्या अवमानामुळे स्मरून जातात. निवडणुकीतील मतांसाठी हिंदुत्वाची लाईन घेत असताना मुसलमानांमुळे काँग्रेसचे नुकसान झाले, असेही म्हणण्यास काँग्रेसवाले कचरत नाहीत. सेक्युलर म्हणवणारा हा राष्ट्रीय पक्ष जेव्हा आपल्या अपयशाचं खापर मुस्लिमांवर फोडतो, त्यावेळी मौलाना आझादांचे काँग्रेसप्रती असलेलं प्रेम आणि त्याग आठवून; हा तोच काँग्रेस आहे ना! असा संभ्रम मनात तयार होतो.

भाजपशासित सत्ताकाळात धर्माच्या नावावर मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. मुस्लिमांची मतं घेऊन लोकशाही मार्गाने सत्तेत आलेला भाजप जेव्हा मुस्लिममुक्त भारताची भूमिका घेतो, त्यावेळी मुस्लिमांनी कुणाकडे संरक्षक म्हणून पाहावं? खान-पान, वेशभूषा, राहणीमान, दिसणे-असणे, उपासना पद्धती यासह त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत असताना या समाजाने नागरी व मानवी हक्काची मागणी कुणाकडे करावी. मुस्लिमांप्रती पोलीस, प्रशासन आणि न्यायव्यवस्था सांप्रदायिक (कम्यूनल) होत आहे. इतकेच नव्हे तर हजारो वर्षांपासून समन्वय व सौहार्दाने राहणारा बहुसंख्य समाज भाजपच्या धर्मवादी राजकारणाला बळी पडून मुस्लिमांचा वैरी झाला आहे, अशावेळी सेक्युलर म्हणवणाऱ्या राष्ट्रीय पक्षाने मुस्लिमद्वेषी भूमिका घेणे, मुस्लिमांचे नैतिक खच्चीकरण करण्यासारखे आहे.

ब्रिटिशांपासून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा हिंदु-मुस्लिम ऐक्याला प्राधान्यक्रम देणारा हा अवलिया अनेकांच्या विस्मृतीत गेला आहे. गेल्या नोव्हेंबरला त्यांची १३०वी जयंती झाली त्यानिमित्त त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची चर्चा नव्याने करणे क्रमप्राप्त ठरते. स्वातंत्र्य चळवळीत कार्यरत असताना मौलाना आझाद यांनी पहिला प्राधान्यक्रम देशाला दिला. या कामात त्यांनी कुटुंबाचीसुद्धा पर्वा केली नाही. मौ. आझाद राष्ट्रीय पक्षाच्या बांधणीसाठी देशभर फिरत राहिले.

१८८८ साली जन्मलेले आझाद प्रकांड पंडित व विलक्षण बुद्धिमत्तेचे व्यक्तित्व होते. कुठलंही महाविद्यालयीन शिक्षण न घेतलेला हा मनुष्य भारताचा शिक्षण मंत्री होऊन देशाला २१व्या शतकाशी दोन हात करणारा शैक्षाणिक विचार दिला. संगीत, नाटक, कला व साहित्य अकादमी स्थापन करून त्यांनी भारताच्या सांस्कृतिक वैभवात कमालीची भर टाकली. या संस्था स्थापनेतून आझादांची दूरदृष्टी किती व्यापक होती, हे लक्षात येते. स्वातंत्र्यानंतर राष्ट्राची उभारणी करणे तसे सोपे नव्हते. पण नेहरूंसोबत त्यांनी ही लिलया अत्यंत खुबीनं पेलली. सामाजिक व सांस्कृतिक ‘इंडिया वीन्स फ्रीडम’ या आत्मचरित्रातून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास शब्दबद्ध केला आहे. अनेक अर्थाने हे पुस्तक महत्वाचे आहे. जाणकारांच्या मते त्यांच्या वक्तित्वाचे दर्शन या पुस्तकामधून होतं. असगरअली इंजिनिअर यांच्या मते या पुस्तकातील शेवटच्या ३० पानातून खरे मौलाना उलगडतात. अनेक भाष्यकारांचे म्हणणे आहे की, या पानांतील मते आझादांचे नाहीत, आझादांनी प्रखर शब्दात आपल्या सहकारी मित्रांवर टीका केली आहे, मौलाना असं करूच शकत नाही, असं या भाष्यकारांना वाटते.

इंडिया वीन्स फ्रीडममधून आझादांनी फाळणीच्या विरोधाची कारणे सविस्तर नमूद केली आहे. पुस्तकात आझाद भारत-पाक फाळणीला पंडित नेहरू आणि सरदार पटेलांच्या राजकीय महत्वाकांक्षाना जबाबदार मानतात. या ३० पानांत आझाद शेवटपर्यत फाळणीच्या विरोधात होते, हे सोदाहरण स्पष्ट होते. एक काळ असा होता की, महात्मा गांधींसह सर्वच राष्ट्रीय नेते फाळणीला संमती देत होते, पण आझाद सर्वांविरोधात एकटेच उभे ठाकले होते. अखेरपर्यंत आझादांना फाळणीचे शल्य बोचत होते. काही अभ्यासकांचे असं म्हणणे आहे की, फाळणीमुळे त्यांनी भारताचा सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ नाकारला होता.

आझादांचे अनेक चरित्रकार मौलाना या भूमिकेशी सहमती दर्शवतात. मौलाना आझाद यांच्या भारतरत्न नाकारण्याबद्दल अजून एक मतप्रवाह आहे. हा पुरस्कार नाकारण्याचे एक वेगळं कारण आझादांचे नातू व ज्येष्ठ पत्रकार फिरोज बख्त अहमद देतात. राज्यसभा चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणतात, ‘१९५६ साली ज्यावेळी स्वत: नेहरूंना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता त्यावेळी त्यांनी मौलानांसमोर प्रस्ताव ठेवला की, “भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तुमचे योगदान मोठं राहिलेलं आहे, हिंदु-मुस्लिम ऐक्यासाठी तुमचे प्रयत्न लाखमोलाचे आहेत, शैक्षाणिक नीती ठरविण्याच्या तुमच्या बहूमूल्य योगदानाबद्दल तुम्हाला ‘भारतरत्न सन्मान’ देण्याची इच्छा आहे, तुम्ही तो स्वीकारावा.” यावर आझाद म्हणाले, “पंडितजी हा सन्मान मी यासाठी स्वीकारणार नाही की, मी त्या कमिटीचा सदस्य आहे जी इतरांना हा पुरस्कार देते. मग मी तो स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही, दुसरं म्हणजे आपण सर्वजण मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिंनी या पुरस्कारापासून स्वत:ला वेगळं ठेवावं तरच या पुरस्काराचे मूल्य व आदर कायम राहील, नसता आपणच सर्वजण स्वत:लाच हा पुरस्कार देऊ करतील, त्यामुळे मी असं म्हणतो की तुम्हीही तो पुरस्कार स्वीकारू नये.” (राज्यसभा टीव्ही, १८ नोव्हेबर २०१५).

आझादांच्या मृत्युनंतर तब्बल ३२ वर्षांनी त्यांना भारतरत्न देण्यात आला. १९९२ साली आझादांना ‘भारतरत्न’ सन्मान पोस्टाद्वारे पाठवण्यात आला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाला नवी दीशा देण्याचे मोठे कार्य करणाऱ्या आझादांना भारतरत्न पोस्टाने पाठवून त्यांची अवहेलना केली गेली. यावर त्यांच्या कुटुंबीयांनी तत्कालीन काँग्रेसच्या पदाधिकारी व अध्यक्षांविरोधात नाराजी दर्शवली होती. आझादांचे नातू फिरोज बख्त अहमद यांनी तो पुरस्कार घेण्यास नकार दिला होता. त्याचे म्हणणे होते की, त्याच साली जेआरडी टाटा, सत्यजित रॉय, अरुणा असफअली यांना भारतरत्न सन्मानाने देण्यात आला होता. मग आझादांना पोस्टाने का?

खरं पाहिले तर मौलाना समोर भारतरत्न काय तर नोबलही फिका पडला असता, कारण त्याची कीर्ती व ख्याती या पदकापेक्षा मोठी होती. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली होती, तरी त्यांच्या मृत्युनंतर त्यांना तो देण्यात आला. खरं पाहिलं तर हा पुरस्कार देऊन काँग्रेसने मौ. आझाद यांचा अवमान केला होता. २०१६ साली सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी भाजपने हवा केली होती. ‘काँग्रेसने मौलाना आझाद व सरदार पटेल या नेहरूंच्या विरोधकांना भारतरत्न का दिला नव्हता?’ असा प्रश्न करत भाजपचे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सावरकरांच्या भारतरत्नसाठी मौलानांचा राजकीय प्यादा म्हणून वापर केला. कदाचित भाजपला माहीत नसावं की मौ. आझादांनी भारतरत्न स्वीकारण्यास ठामपणे नकार दिला होता.

आजचे काँग्रेस व मुस्लिम राजकारण पाहता मौलाना आझादांचे दुर्दैव म्हणावे लागेल की त्यांना एका धर्मापुरतं बंदीस्त करण्यात आलं आहे. आज काँग्रेसने मौ. आझाद यांना जयंती व पुण्यतिथी पर्यंत मर्यादित ठेवलं आहे तर मुस्लिमांनी संघटना व शहरातील चौकाच्या नामफलकापुरते बंदीस्त केलं आहे. काँग्रेसच्या ‘मुस्लिम टोकनीझम’ धोरणामुळे आज भारतीय मुस्लिम काँग्रेसपासून दुरावला आहे. मुस्लिमांनी काँग्रेसशी जोडून घेणे धर्मांचरणाचा भाग असल्याचे मौलाना आझाद म्हणत असे. पण आज मुस्लिमासंदर्भात काँग्रेसची भूमिका पाहिल्यास काँग्रेसशी जोडून घेण्यावर विचार करावा असं सर्वसामान्य मुस्लिम समुदायाला वाटते. भाजपच्या असहिष्णू राजकारणांवर काँग्रेसनं घेतलेल्या भूमिकेवर हा आझाद यांचा काँग्रेस आहे ना! असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.

  • कलीम अजीम, पुणे ( Twitter@kalimajeem )