दिव्याखाली अंधार ; स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील स्वच्छतागृह दोन वर्षांपासून बंद

दिव्याखाली अंधार ; स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या महापालिकेच्या निगडी स्मशानभूमीतील स्वच्छतागृह दोन वर्षांपासून बंद 

पिंपरी : निगडी अमरधाम स्मशानभूमीतील शौचालयाची दुरावस्था झाल्याने हे शौचालय तब्बल दोन वर्षांपासून बंद आहे. यामुळे प्रशासनाच्या (PCMC) वतीने नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली होती. परंतू या कामास पाच महिन्यांचा कालावधी उलटून देखील महापालिकेने नेमलेल्या ठेकेदाराकडून अद्यापही काम पूर्ण करण्यात आलेले नाही. अत्यंत संथ गतीने चाललेल्या शौचालयाच्या बांधकामामुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे या तक्रारीची दखल घेऊन शौचालयाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

या संदर्भात आयुक्तांना दिलेल्या तक्रार अर्जात खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी (Nigdi) अमरधाम स्मशानभूमीमधील सार्वजनिक शौचालयाला बांधून तब्बल तीस वर्षे झालेली आहेत. हे शौचालय अत्यंत जीर्ण झाले असून त्यातील भिंतींना मोठ-मोठे तडे गेल्याने शौचालय कोणत्याही क्षणी ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात अनेक वेळा तक्रारी केल्या नंतर पाच महिन्यापूर्वी प्रशासनाकडून नवीन शौचालय बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली.परंतू अद्याप पर्यंत सदरील शौचालयाचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही.केवळ तिनशे स्क्वेअर फुट इतक्या जागेत चालू असणा-या शौचालयाचे काम एवढ्या कालावधीत पूर्ण व्हायला हवे होते. परंतू आत्तापर्यंत फक्त शौचालयाच्या पाया पर्यंतचे (प्लिंथ लेव्हल) काम झाले आहे. त्यामुळे सदर काम हे अत्यंत धीम्या गतीने चालू असल्याचे दिसून येत आहे. पालिकेकडून स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली शहरभर फक्त जाहिराती व रंगरंगोटीवर वारेमाप पैसा खर्च केला जातो. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणावर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या पिंपरी महापालिकेचा कारभार म्हणजे ‘दिव्या खाली अंधार’ असाच आहे. स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग व्यक्ती, महिला वर्ग, तसेच नागरिकांना यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. परंतू याचे गांभीर्य लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारीवर्ग तसेच ठेकेदाराला नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडे या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील ठेकेदार त्याच्या सोयीनुसार हे काम करीत आहे. ठेकेदारावर प्रशासनाचा वचक राहिलेला नाही. त्यामूळे स्वतः आयुक्तांनी यात लक्ष घालून शौचालयाचे काम तात्काळ पुर्ण करण्या संदर्भात संबंधित यंत्रणेला आदेश द्यावेत,अन्यथा नाईलाजास्तव तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिपक खैरनार यांनी दिला आहे.