गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा – रुपेश मोरे

गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्ते दुरुस्त करा - रुपेश मोरे

पुणे (Lokmarathi) : जुलै महिण्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भुस्सखलनाच्या घटना घडल्या. अनेक रस्ते, ओढ्या, नाल्यांवरील पुल वाहुन गेले. यामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. 19 सप्टेंबर पासून सुरु होणा-या गणेशोत्सवासाठी पुणे – पिंपरी चिंचवड मधून लाखो नागरीक कोकणात जातील. त्यांना जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील एकमेव रस्ता सोयीस्कर आहे. परंतू मागील महिण्यातील पावसामुळे या रस्त्याची दूरावस्था झाली आहे. गणेशोत्सवापुर्वी ताम्हिणी घाटातील रस्त्यांची कामे युध्द पातळीवर पुर्ण करावीत अशी मागणी कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

कोकण खेड युवाशक्तीच्या वतीने मोरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार,यांना पाठविलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, पुणे, पिंपरी चिंचवड मधिल कोकणवासीयांचे आपल्या मुळगावी कोकणात जुलै महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीवाडीचे नुकसान झाले आहे. शेत जमिनी वाहून गेल्या असून घरांची पडझड झाली आहे. त्याची डागडूजी करणे देखिल आवश्यक आहे. त्यामुळे सप्टेंबर महिण्याच्या दुस-या आठवड्यात अनेक नागरीक आपल्या मुळगावी कोकणात जातील. पुणे – पिंपरी चिंचवड मधिल नागरीकांना कोकणात जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता सोयीस्कर आहे. या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खड्डे झाले आहेत. तर ज्या भागात रस्ता सिमेंटचा आहे तेथे साईड पट्टीवरील भराव, खडी वाहून गेलेली आहेत. वाढणा-या वाहतुकीमुळे अपघात होण्याची व वाहतूक विस्कळीत होण्याची भिती आहे. यासाठी युध्द पातळीवर रस्ते दुरुस्त करावेत. अशी मागणी कोकण खेड युवाशक्तीच्यावतीने रुपेश मोरे यांनी केली आहे.