देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
  • नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने जाहीर केली आकडेवारी

नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरून ही बाब उघड झाली आहे.

देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली.

त्यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता.

वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर, कृषी संकटामुळे १० हजार ६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. तर, वर्ष २०१६ मध्ये बेरोजगारांपेक्षा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण अधिक होते. त्यातही फारसा फरक नव्हता. वर्ष २०१६ मध्ये ११ हजार ३७९ शेतकरी-शेतमजुरांनी आत्महत्या केल्या होत्या. तर, ११ हजार १७३ बेरोजगारांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचेही एनआरबीने म्हटले आहे. देशात वर्ष २०१८ मध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये ३.६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये १ लाख ३४ हजार ५१६ मृत्यू हे आत्महत्या म्हणून नोंद करण्यात आले होते. तर, वर्ष २०१७ मध्ये १ लाख २९ हजार ८८७ जणांनी आत्महत्या केली होती.

बेरोजगारांच्या आत्महत्यांमध्ये ८२ टक्के पुरुषांचा समावेश आहे. केरळ (१५८५), तामिळनाडू (१५७९) आणि महाराष्ट्र (१२६०), कर्नाटक (१०९४) आणि उत्तर प्रदेश (९०२) या राज्यांमध्ये सर्वाधिक बेरोजगारांच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.