दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
  • मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या – सिद्दीकभाई शेख

पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी ” निदर्शने आंदोलन ” करण्यात आले.


यावेळी बोलताना अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिकभाई शेख यांनी सांगितले कि, उत्तरप्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून ,महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. मनीषा वाल्मिकी प्रकरणामध्ये स्थानिक पोलीस प्रशासन ,पोलीस अधीक्षक हाथरस , जिल्हाधिकारी ,राज्यसरकार या सर्वांच्या संगनमताने मनीषा वरील अत्याचाराचे पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील तपासात पुराव्याअभावी मनीषाला न्याय मिळण्यापासून वंचित राहावे लागेल . या गोष्टीला उत्तरप्रदेश सरकार जबाबदार असल्याने उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मारुती भापकर यांनी हि लढाई अधिक आक्रमकपणे लढण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. यावेळी ” फासी दो ,फासी दो ,हत्यारों को फासी दो , उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करा , योगी आदित्यनाथ राजीनामा द्या अशा घोषणा देण्यात आल्या.


यावेळी संघटनेच्या शहरध्यक्ष राजश्री शिरवळकर , कार्याध्यक्ष हमीद शेख , संघटक निर्मला डांगे ,तौफिक पठाण, शाकीर शेख, ओबीसी संघर्ष सेनेचे सुरेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते दीपक चखाले, सागर गायकवाड ,रयत विद्यर्थी परिषदेचे सूर्यकांत सरोदे, भैयासाहेब गजधने, वसीम पठाण, राजेश अपराज, सुभाष गलांडे, कलीम शेख, हमीद मणियार, फातिमा अन्सारी, किसन गवते आदी सहभागी झाले होते. आंदोलनाच्या शेवटी उत्तरप्रदेश सरकार बरखास्त करा या मागणीचे निवेदन वाकड पोलिसांमार्फत ते राष्ट्रपतींना देण्यात आले आहे.